कार्यरत राहणे हाच आनंदी जीवनाचा मूलमंत्र – कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : “कोणत्याही क्षेत्रात आपण असलो तरी सतत कार्यरत राहिलो तर जीवन आनंदी व निरामय राहत असते. त्यामुळे निवृत्तीनंतरही आपल्या आवडीचे काम करत राहणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन डॉ. विजय फुलारी यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे एप्रिल अखेरीस सेवानिवृत्त होणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना गुरुवारी (दि. ३०) महात्मा फुले सभागृहात निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या समारंभात इतिहास विभागातील प्राध्यापक डॉ. पुष्पा गायकवाड, क्रीडा विभागातील कक्षाधिकारी तथा बास्केटबॉल प्रशिक्षक गणेश कड आणि स्थावर विभागातील कर्मचारी मुरलीधर भिंगारे यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला.

गेल्या सव्वा दोन वर्षांत अनेक कर्मचारी निवृत्त झाले असून त्यानुसार नवीन भरती कमी झाल्यामुळे कामाचा ताण वाढत असल्याचे डॉ. विजय फुलारी यांनी नमूद केले.
सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. पुष्पा गायकवाड यांनी विद्यापीठातील २८ वर्षांच्या सेवेत सहकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि प्रशासन यांचे सहकार्य लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर गणेश कड यांनी विद्यापीठात सेवा बजावत असताना प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय शिंदे यांनी केले, तर संजय लांब यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी क्रीडा संचालक डॉ. सचिन देशमुख, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, इतिहास विभागप्रमुख डॉ. गीतांजली बोराडे, तसेच ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या प्रमुख डॉ. अश्विनी मोरे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
