उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे मैदानी क्रीडा खेळाडूंसाठी १२ जून पर्यंत १० दिवस कालावधीचे विशेष सराव शिबीराचे उदघाटन
जळगाव : विद्यार्थी खेळाडूंनी शिस्त व सरावातील सातत्य निरंतर ठेवल्यास त्यांना विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त होवुन त्यांचा भविष्यकाळ उज्वल होऊ शकतो असे प्रतिपादन प्र-कुलगुरु प्रा एस टी इंगळे यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे मैदानी क्रीडा प्रकारातील विद्यार्थी व विद्यार्थिंनी खेळाडूंसाठी आजपासुन १२ जून पर्यंत १० दिवस कालावधीचे विशेष सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचे उदघाटन करतांना प्र-कुलगुरु प्रा एस टी इंगळे बोलत होते. यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य ॲङ अमोल पाटील, प्रा म सु पगारे, अधिसभा सदस्य स्वप्नाली काळे-महाजन व क्रिडा संचालक डॉ.दिनेश पाटील उपस्थित होते.

प्र-कुलगुरु प्रा एस टी इंगळे पुढे म्हणले की, विद्यापीठाने टॅलेंट सर्च सुरु केले असुन त्याचाच एक भाग म्हणून हा सराव शिबीर आहे. विद्यार्थ्यांमधील क्रीडा नैपुण्य ओळखुन आजच्या शिबिरात विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. खेळाडू विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपले क्रीडा नैपुण्य स्पर्धांमध्ये दाखवावे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडु होण्यासाठी परिश्रम करावे. विद्यापीठ नेहमीच खेळाडू विद्यार्थ्यांना मदत करीत असते. व्यवस्थापन परिषद सदस्य ॲङ अमोल पाटील यांनी सांगितले की, खेळाडूंनी मेहनत घ्यावी. आपल्या शंकांचे निरसन प्रशिक्षकांकडुन करुन घ्यावे. विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा. विद्यापीठाच्या योजनांचा लाभ घ्यावा.
या शिबीरात १०० मीटर, २०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटर, ५ हजार मीटर, १० हजार मीटर धावणे तसेच लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, अर्ध मॅरॉथॉन, रिले अशा विविध क्रीडा प्रकारांच्या सराव खेळाडुंकडुन करुन घेण्यात येणार आहे. त्याकरीता त्यांना तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण लाभाणार आहे.
या १० दिवस चालणाऱ्या सराव शिबीरात विविध महाविद्यालयाचे निवडक विद्यार्थी व विद्यार्थिंनी खेळाडु सहभागी झाले असून या शिबिरात सकाळी ३ तास सराव, दुपारी व्याख्यान आणि सायंकाळी ३ तास सराव असे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या वतीने खेळाडुंची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून प्रवास खर्च देखील विद्यापीठामार्फत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ शैलेश पाटील यांनी केले. प्रास्तविक व आभार डॉ दिनेश पाटील यांनी केले.