पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे पाली भाषा परिसंवाद संपन्न
पाली भाषेत ज्ञानाचा व संशोधनाचा मोठा भांडार – कुलगुरू डॉ महानवर
सोलापूर : पाली, संस्कृत भाषेमध्ये प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व ज्ञानाचा मोठा भांडार आहे. या भाषा विद्यार्थी, अभ्यासक व संशोधकांनी अवगत करून प्राचीन ज्ञानाचा वापर करावा आणि प्रगती साधावी, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ प्रकाश महानवर यांनी केले.




सोमवारी, सोलापुरातील डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र आणि पाली भाषा विभागाच्यावतीने आयोजित पाली भाषा परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू प्रा महानवर हे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जयसिंगपूरचे भदंत काश्यपायन महाथेरो, अथर्व चॅरिटेबल ट्रस्टचे चंद्रकांत सांगलीकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, अध्यासन केंद्राचे समन्वयक तथा भाषा संकुलाचे संचालक डॉ गौतम कांबळे, सिद्धार्थ कॉलेज मुंबईचे डॉ विजय मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ विजयकुमार झुंबरे यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ उत्तम कांबळे यांनी करून दिला.
कुलगुरू डॉ महानवर म्हणाले की, पाली, संस्कृत, मोडी लिपी या प्राचीन भाषा आहेत. या भाषांमध्ये खूप काही ज्ञानाचे साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे आजच्या पिढीने या भाषा शिकून घ्यावे. विद्यापीठात या भाषांचे अभ्यासक्रम आहे. या प्राचीन भाषांमध्ये संशोधनास मोठा वाव आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. विद्यापीठाकडून विविध उपक्रम सुरू आहेत. वृक्ष लागवड व संवर्धनासाठी मोठे पाऊल विद्यापीठाने उचलले आहे. पाच लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प विद्यापीठाने केलेला आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
चंद्रकांत सांगलीकर यांनी पाली भाषेच्या संवर्धनासाठी सर्व स्तरातून प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगितले. प्राथमिक शाळेपासूनच विद्यार्थ्यांना पाली भाषेचे शिक्षण देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. राजाभाऊ सरवदे यांनी 2600 वर्षांपूर्वीची परंपरा पाली भाषेला लाभली आहे. प्राचीन इतिहास, संस्कृती ज्ञानाचा ठेवा या भाषेमध्ये आहे. विद्यापीठात पालीभाषा सुरू करण्यामागची पार्श्वभूमी त्यांना यावेळी सांगितली. येत्या काळात पीएच डी करण्याची संधी देखील विद्यापीठात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ गौतम कांबळे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राची माहिती दिली. पाली भाषा विभागाची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. येत्या काळात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ तेजस्विनी कांबळे यांनी केले.