यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने “विकसित कृषि संकल्प अभियान”

नाशिक जिल्ह्यात “विकसित कृषि संकल्प अभियान”ला उत्साहात प्रारंभ

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग, आत्मा (AATMA) तसेच राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (ICAR-NRCG, पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यात “विकसित कृषि संकल्प अभियान” उत्साहात सुरू झाले आहे. २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण भारतभरात हे अभियान कृषि मंत्रालयाच्या निर्देशानुसार राबवले जात आहे. या अभियानाचा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत अद्ययावत शेती तंत्रज्ञान पोचवणे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन वैज्ञानिक उपाययोजना सुचवणे तसेच शेतीपूरक व्यवसायांतून शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे असा आहे.

भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या वतीने डॉ. रोशनी समर्थ, डॉ. डी.एस. यादव आणि डॉ. सुजॉय सहा या कृषि शास्त्रज्ञांच्या विशेष पथकाने नाशिकमध्ये कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यीय दोन चमू जिल्ह्यातील पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, चांदवड, सिन्नर व नाशिक या आठ तालुक्यांमध्ये गावोगावी पोहोचत आहेत. १५ दिवसांत ९० गावांमध्ये प्रत्यक्ष संवादाद्वारे हे अभियान राबविले जात आहे.

Advertisement

अभियानात माती व पाणी परीक्षण, पीक लागवडीतील नविन तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन, शेळीपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, मशरूम उत्पादन, नैसर्गिक शेती, महिलांसाठी उपयुक्त शेती अवजारे या विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय राज्य व केंद्र शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे कामही अधिकारी करत आहेत.

अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉ. नितीन ठोके, राजाराम पाटील, डॉ. श्याम पाटील, डॉ. प्रकाश कदम, सौ. अर्चना मोहोळ, श्री मंगेश व्यवहारे यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राची टीम मेहनत घेत आहे.

या उपक्रमामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख होत असून, उत्पन्नवाढीच्या दिशेने नवे मार्ग खुले होत आहेत. “विकसित कृषि संकल्प अभियान” हे शेतीचे भविष्य घडवणारे पाऊल ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *