डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवक महोत्सवाचा बुधवारपासून जल्लोष

पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते उदघाटन

अभिनेते मंगेश देसाई, धनजंय सरदेशपांडे यांची उपस्थिती

चार दिवस रंगणार महोत्सव

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाची २५ ते २८ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले. सहा रंगमंचावर ३६ प्रकारच्या कला सादर होणार आहेत.

नाट्यशास्त्र विभागाजवळ मुख्य रंगमंच उभारण्यात आले असून याच ठिकाणी उद्घाटन, समारोप व लोककला सादर होणार आहेत. महोत्सवाचे उद्घाटन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते बुधवारी (दि २५) सकाळी ११:०० वाजता होईल. यावेळी अभिनेते तथा निर्माते मंगेश देसाई, अभिनेते माजी विद्यार्थी धनंजय सरदेशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. कुलगुरु डॉ विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास संचालक डॉ कैलास अंभुरे यांची उपस्थिती राहील. तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ योगिता होके पाटील, अ‍ॅड दत्तात्रय भांगे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर समारोपप्रसंगी प्रख्यात अभिनेते समती चौघेले, माजी विद्यार्थी तथा अभिनेते श्याम राजपूत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येईल.

यावेळी कुलपती नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ गजानन सानप, प्राचार्य डॉ गौतम पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. महोत्सवाच्या अयोजनासाठी एकुण ३० समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या सर्व सदंस्याची कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि २१) आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, संचालक डॉ कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती. यावेळी कलावंतासाठीचा दैनंदिन भत्ता १२० वरुन ३०० रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे जेवळ दर्जेदार व उत्तम देण्यात येईल. तसेच निवास व्यवस्थाही चांगली ठेवण्याबाबत बैठकीत सूचना करण्यात आल्या.

इंद्रधनुष्य प्रमाणे उत्तम नियोजन : कुलगुरु

कुलगुरुपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर दोन महिन्याच्या आत घेण्यात आलेला ’इंद्रधुनष्य’ राज्य युवा महोत्सव अत्यंत शिस्तबध्द व उत्कृष्ट नियोजनात घेण्यात आला. या प्रमाणेच ’युवा महोत्सव’ देखील अत्यंत शिस्तीत व वेळेवर घेण्यात येईल. चार दिवस विद्यापीठ परिसरात आलेले शेकडो युवा कलावंत आपल्या परिसराच्या आठवणी घेऊन आनंदाने परतील याची काळजी आपण सर्व जण घेऊ, असे कुलगुरु डॉ विजय फुलारी बैठकीत म्हणाले. समितीतील सर्वांनी उत्तम काम करुन जबाबदारी पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com