आरोग्य विद्यापीठाच्या ‘कुलगुरु कट्टा’ उपक्रमात कुलगुरु यांचा सोलापूर येथे विद्यार्थी संवाद
आवडीच्या क्षेत्रात कौशल्य साध्य करावे – कुलगुरु लेफ्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांचे प्रतिपादन
सोलापूर : यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य साध्य करुन शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) पविसेप, अविसेप, विसेप यांनी केले. विद्यापीठातर्फे सोलापूर येथे अश्विनी रुरल वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रात ‘कुलगुरु कट्टा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) सवमेत प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ सचिन मुंबरे, विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ विठ्ठल धडके, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, अश्विनी रुरल वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिश्ठाता डॉ सुहास कुलकर्णी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील, उपकुलसचिव एन व्ही कळसकर व्यासपीठावर उपस्थित होते.


विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, स्वयंपूर्ण शिक्षणाकडे विद्यार्थ्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे. गुणवत्ता व विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. संशोधन आणि नवीन कल्पनांचा प्रत्यक्ष वापर होण्यासाठी विविध उपक्रम विद्यापीठाकडून सुरु करण्यात आले आहेत त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा. क्रीडा व कला क्षेत्रातही आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यसाठी महाविद्यालयांनी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. नवीन शिक्षण पध्दतीत निर्देशित केलेल्या कृती अंवलंबिण्यासाठी शिक्षकांनी व तज्ज्ञांनी पुढाकार घेऊन काम करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविण्यासाठी जिद्द व शिस्त प्रत्येकाने कायम ठेवावी असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्रात सर्व विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या समान संधी आहेत. कौशल्य गुण विकसित करून त्यात निपुणता मिळवणे आवश्यक आहे त्यसाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, कुलगुरु यांचा विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद हा अभिनव उपक्रम आहे. आपल्या शैक्षणिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सुरु करण्यात आलेला ‘कुलगुरु कट्टा’ हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या मा. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ सचिन मुंबरे यांनी सांगितले की, हा अभिनव उपक्रम अत्यंत यशस्वी झाला असून सोलापूर येथे संपन्न होत असलेले नववे पुष्प आहे. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांचा भरभरुन मिळणारा प्रतिसाद व त्यांच्या शैक्षणिक समस्यांची दखल विद्यापीठाकडून घेतली जात आहे.
विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ विठ्ठल धडके यांनी सांगितले की, विद्यापीठाने सुरु केेलेले विविध उपक्रम प्रशंसनीय असून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्यक्ष विद्यापीठात एकदातरी जाऊन भेट देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील प्रास्ताविकात सांगितले की, कुलगुरु महोदया यांचा त्याबाबत प्रशासन व संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
आंतरराष्ट्रीय सार्क स्पर्धेकरीता निवड झालेली तसेच 38 वा आतंरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव ‘उत्सव-2025’ मध्ये क्लासिकल इंन्स्ट्रुमेेंट प्रकारात प्रथम पारितोषिक प्राप्त विद्यार्थीनी गुंजन शिरभाते तसेच असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या राश्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत निवड झालेली इश्वरी गानबोटे व विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेली तितिक्षा देशमुख यांचा कुलगुरु यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनंसपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी परीक्षा पध्दती, संशोधन, विद्यापीठाच्या विविध योजना आदींबाबत कुलगरुंना प्रश्न विचारून संवाद साधला. उपस्थितांचे आभार डॉ देवेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सहायक कुलसचिव संदीप राठोड यांनी विद्यापीठाच्या समर इंटर्नशिप प्रोग्राम विषयी माहिती दिली तसेच मेंटल प्रिपरेशन फॉर कॉन्सस्ट्रेशन विषयावर मानसी हिरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या प्राधिकरण सदस्य डॉ दत्ता पाटील, विधी अधिकारी अॅड संदीप कुलकर्णी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी अविनाश सोनवणे, अर्जुन नागलोथ, कृष्णा भवर, सोहम वानेरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात विविध महाविद्यालयातील पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.