संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ‘आविष्कार’ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
विद्याथ्र्यांनो! आपल्या नवकल्पनांना प्रत्यक्षात उतरवा – कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे
अमरावती : संशोधनासाठी अनेक क्षेत्रे खुली असून विद्याथ्र्यांनी आपल्या मनातील नवकल्पनांना केवळ विचारांपुरते मर्यादित न ठेवता त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जी. एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी केले. ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अविष्कार सेलतर्फे आयोजित विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, तर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड आणि आविष्कार सेलच्या समन्वयक डॉ. मनिषा कोडापे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. विनायक देशपांडे पुढे म्हणाले की, तत्कालीन कुलपती कृष्णा यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘आविष्कार’ स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मोठी चालना मिळाली आहे. आजच्या तरुणांकडे कल्पनांची कमतरता नसून गरज आहे ती कठोर परिश्रम, सातत्य आणि समाजाच्या गरजांशी संशोधन जोडण्याची. संशोधन केवळ पदवी मिळवण्यासाठी नसून, दर्जेदार जीवन व समाजोपयोगी बदल घडवण्यासाठी असावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी एलन मस्क यांच्या यशाचे उदाहरण देत सूक्ष्म निरीक्षण, सामाजिक गरजा ओळखणे आणि नवकल्पनांचा प्रत्यक्ष वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच बिहारमधील ‘पाण्यावर चालणाऱ्या सायकल’ या संकल्पनेचा उल्लेख करत गरज हीच संशोधनाची जननी आहे, असे नमूद केले. एरोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संदर्भात बोलताना तंत्रज्ञान मानवाची जागा घेणार नसून मानवी कामे अधिक सुलभ करेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात डॉ. प्रवीण उपरे यांनी दक्षिण कोरियातून ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत संशोधन विषयाची निवड या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कोअर नॉलेज, लॅब स्किल्स आणि संवाद कौशल्ये संशोधनासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
संशोधन व नवोपक्रम हा अर्थव्यवस्थेचा कणा – कुलगुरू
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सांगितले की, शेतकरी आत्महत्येसंदर्भात विद्यापीठ संशोधन प्रकल्प राबवत असून त्यातून समाजोपयोगी निष्कर्ष अपेक्षित आहेत. ‘आविष्कार’ हा राज्यपाल अभिमत प्रकल्प असून संशोधन व नवोपक्रम हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. राज्यस्तरावर निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि निराश न होता सातत्याने संशोधन दृष्टी वाढवण्याचे आवाहन केले.

संशोधन प्रदर्शनीचे उद्घाटन
नवसंशोधक विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध मॉडेल्सचे भौतिकशास्त्र विभागाच्या सभागृहात सादरीकरण करण्यात आले. डॉ. विनायक देशपांडे यांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या मॉडेल्सची पाहणी करून त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे कौतुक केले.

कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन, राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली. सूत्रसंचालन प्रा. मेघा कोटक, स्वागत व परिचय डॉ. नीरज घनवटे, प्रास्ताविक डॉ. मनिषा कोडापे, तर आभार डॉ. सुजाता काळे यांनी मानले. पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
