राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात समाजकार्य ग्रामीण शिबिराचा समारोप
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समाजकार्य ग्रामीण शिबिराचा समारोप पार पडला. समाजकार्य शाखेतील विभाग प्रमुख डॉ जितेंद्र वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवशीय ग्रामीण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रम अंतर्गत एमएसडब्लू द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांनी श्री गुरुदेव पंचवटी सेवाश्रम, खापा पाटन, तालुका कामठी येथे ग्रामीण मुक्काम शिबिराचे आयोजन केले होते. या ग्रामीण शिबीर अंतर्गत प्रशिक्षानार्थीनीं गावात विभिन्न प्रकारचे उपक्रम राबविले. यामध्ये ग्रामीण लोकसहभागीय मुल्यावलोकन (PRA-Participatory rural appraisal), ग्रामीण भागाचे सर्वेक्षण, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, महिलांवरील अत्याचार, व्यसनमुक्तीवर कार्यक्रम सादर केले.
स्पर्धा परीक्षेची तयारी, सामाजिक जनजागृती, श्रमदान तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अश्या विभिन्न प्रकारचे उपक्रम या ग्रामीण शिबिराच्या माध्यतून राबविण्यात आले. बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रामीण शिबिराचे निरोप समारंभ पार पडला. या समारोपीय कार्यक्रमाला सरपंच आशाताई मदनजी राजूरकर, ग्रामपंचायत सदस्य चंदू सनेसर, गुरुदेव पंचवटी सेवाश्रमातील काळजी वाहक दिलीप गायकवाड तसेच समाजकार्य आणि समाजशास्त्र शाखेतील शिक्षकवृंद सोबतच ग्रामीण शिबिराचे आयोजक विलास सूर्यवंशी आणि सह आयोजिका डॉ प्रियंका उके – अंबादे हे प्रामुख्याने उपस्थित होते.