एमजीएम विद्यापीठात पद्मश्री प्रो. जे. डी. यादव यांचा प्राध्यापकांशी संवाद
आपल्या कौशल्यात दररोज वाढ होणे आवश्यक : पद्मश्री प्रो. जे. डी. यादव
छत्रपती संभाजीनगर | CampusKatta News
वयाच्या कोणत्याही टप्प्यावर माणसाने शिकणे थांबवू नये. वय कितीही असले तरी स्वतःच्या कौशल्यात दररोज वाढ होणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रा. जे. डी. यादव यांनी केले.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या प्रसंगी त्यांनी
‘Citius, Altius, Fortius : Driving Research, Innovation and Translation for a Developed India through Indian Academia’
या विषयावर प्राध्यापकांशी सखोल संवाद साधला.

उच्च शिक्षणातील बदल, आव्हाने व संधी
या कार्यक्रमाला एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ, एमजीएम स्कूलच्या संचालिका डॉ. अपर्णा कक्कड, प्राचार्या डॉ. विजया मुसांडे, रसायन अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सदानंद गुहे यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक व मान्यवर उपस्थित होते.
पद्मश्री प्रा. यादव यांनी सांगितले की, उच्च शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल होत असून शहर, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य वाढवणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक विद्यापीठाचे ध्येय आपल्या संस्थेला महान बनविण्याचे असले पाहिजे.
विद्यापीठाचे चार स्तंभ
त्यांनी विद्यापीठाच्या यशासाठी चार महत्त्वाचे स्तंभ अधोरेखित केले:
- अकॅडेमिक्स
- विद्यार्थी
- माजी विद्यार्थी
- सहाय्यक कर्मचारी
या सर्वांच्या संयुक्त योगदानातूनच संस्था महान बनते, असे त्यांनी नमूद केले.

संशोधन, नवोपक्रम आणि ‘तीन P’ सूत्र
संशोधन व नवोपक्रमासाठी उद्योगसहकार्य, INSPIRE, रामानुजन फेलोशिप यांसारख्या योजनांचा विस्तार, गुणवंत प्राध्यापकांची भरती आणि ‘Kite-Flying Research Ideas’ यांसारख्या संकल्पनांचा पुरस्कार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
उच्च शिक्षण संस्थांच्या यशासाठी
Patent – Publish – Prosper (तीन P)
या सूत्रावर काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्ञानकेंद्रित शिक्षणावर भर
पद्मश्री प्रा. यादव यांनी सांगितले की, शिक्षण केवळ परीक्षा-केंद्रित नसून ज्ञानकेंद्रित असले पाहिजे. ज्ञानाचा खरा उपयोग चर्चेतून व प्रत्यक्ष अनुभवातून होतो. विद्यार्थ्यांना अधिक प्रात्यक्षिक व उपयोजित ज्ञान मिळणे आवश्यक आहे.
शिक्षकांचे नियमित मूल्यमापन, आत्मविश्वास, आणि आपल्या अभियांत्रिकी शाखेबद्दल अभिमान बाळगणे हे गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाचे घटक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एमजीएम विद्यापीठाची भूमिका
यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ यांनी सांगितले की, पद्मश्री प्रा. यादव यांनी मांडलेल्या सर्व सूचनांवर एमजीएम विद्यापीठात प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू आहे. मुख्य अभियांत्रिकी शाखांवर विशेष लक्ष देत उद्योग-विद्यापीठ सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक नव्हे तर सर्वांगीण विकास साधणे हेच विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विभागप्रमुख डॉ. सदानंद गुहे यांनी केले.
