एमजीएम विद्यापीठ मध्ये राष्ट्रीय युवा शिबिर यशस्वीपणे संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठ आणि राष्ट्रीय युवा संगठन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवसीय राष्ट्रीय युवा शिबिर विद्या अरण्यम विद्यालय, गांधेली येथे निसर्गाच्या सानिध्यात यशस्वीरित्या पार पडले.
या शिबिरात कर्नाटक, मध्यप्रदेश, ओडिशा, दिल्ली, उत्तरप्रदेश, छत्तीसगढ, पंजाब आणि महाराष्ट्रातील १०० युवक-युवतींनी सहभाग घेतला. सकाळची प्रार्थना, सर्वधर्म प्रार्थना कार्यक्रम, समूह चर्चा, चौपाल, ‘सकाळचं सत्य’, सर्वधर्म प्रार्थना आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांमधून सामाजिक एकता, मानवी मूल्यबोध व समभावाचे तत्त्व अधोरेखित करण्यात आले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, गांधी शांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमार प्रशांत, प्रा. एच.एम. देसरडा, श्रीराम जाधव आणि ज्ञानेश्वर सोनूने उपस्थित होते. कुलपती अंकुशराव कदम यांनी यावेळी बोलताना एमजीएमची स्थापना गांधी विचारांच्या जपणुकीसाठी झाल्याचे स्पष्ट करत संस्थेची ४० वर्षांची वाटचाल मांडली. प्रा. देसरडा यांनी महात्मा गांधींना अनुकरणीय ठरवण्याची गरज मांडली. कुमार प्रशांत यांनी युवकांनी भारतीयता आणि सर्वधर्म समभावासाठी ठाम उभे राहण्याचे आवाहन केले. गुरु पार्वती दत्ता, सुधाकर जाधव, मायाताई देशपांडे, शोभाताई शिराडोणकर, ज्ञानप्रकाश मोदानी, लताताई राजपूत, विद्यालयाच्या प्राचार्या पल्लवी मॅडम इ. व्यक्तींनी मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पडली.
शिबिरात विविध विषयांवर चर्चा झाली. कुमार प्रशांत, प्रेरणा देसाई, मनोज ठाकरे, मानस पटनायक, ज्ञानेश्वर सोनूने आणि प्रा. जॉन चेल्लादुराई यांनी युवकांशी संवाद साधला. दया सिंह यांनी सामाजिक सत्य आणि समरसतेच्या उदाहरणांची मांडणी केली. शिबिरात एलोरा लेणी अभ्यासदौरा, एमजीएम विद्यापीठातील खादी, फॅशन डिझाईन, रोबोटिक्स व फिल्म विभागांचा अभ्यास, आणि संगीत-नाट्य विभागाचे सादरीकरण यांचाही समावेश होता. ओडिशा, कर्नाटक, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील युवकांनी पारंपरिक गीत-नृत्य सादर करून सांस्कृतिक एकतेचा संदेश दिला.–