अमरावती विद्यापीठात प्राचार्य व विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांची सभा संपन्न

महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवाव्यात – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते

अमरावती : सर्व महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या विद्यार्थी हितार्थ असलेल्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात, असे आवाहन कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी प्राचार्य, विद्यार्थी विकास अधिकारी यांच्या शुक्रवारी झालेल्या संयुक्त सभेत केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने विद्यापीठ परिसरातीलच दृकश्राव्य सभागृहात प्राचार्य व विद्यार्थी विकास अधिकारी यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर विद्यार्थी विकास मंडळाचे अमरावती जिल्हा समन्वयक डॉ सावन देशमुख, यवतमाळ जिल्हा समन्वयक डॉ निखिल नलोडे, अकोला जिल्हा समन्वयक डॉ नेत्रा मानकर, विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर उपस्थित होते.

कुलगुरू डॉ बारहाते पुढे म्हणाले, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी बारा योजना आहेत. योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना झाला पाहिजे, त्यासाठीची प्रक्रिया विद्यापीठाने ऑनलाईन पध्दतीने पोर्टलव्दारे महाविद्यालयांना उपलब्ध करुन दिलेली असून महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे योजनेचे अर्ज पोर्टलव्दारे विद्यापीठाकडे सादर करावेत. ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना योजनांची माहिती करुन देऊन त्यांना त्यांचा लाभ मिळवून द्यावा, जेणेकरुन असे विद्यार्थी विकासाच्या प्रवाहात येतील, एवढेच नाही, तर योजनांचे उद्दिष्ट सुध्दा यशस्वी होईल. अनेक पुरस्कारही विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येतात, त्याचीही माहिती विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी करुन द्यावी, जेणेकरुन विद्यार्थी त्यादृष्टीने परिश्रम करतील, असेही कुलगुरू म्हणाले.

Advertisement

विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर यांनी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या संत गाडगे बाबा कमवा आणि शिका योजना, विद्यार्थीनी बस पास सवलत, शुध्द पेयजल, शिक्षण संरक्षण, विद्याधन, विद्यार्थी विकास निधी, शिष्यवृत्ती, कौशल्य विकास, सायकल, विद्यार्थी सुरक्षा, स्व रामप्रकाश शामलाल राठी स्मृति शिष्यवृत्ती, विद्यापीठ दायित्व निधी / महाविद्यालय दायित्व निधी आणि विविध पुरस्कार योजनेमध्ये असलेले आदर्श विद्यार्थी पुरस्कार, बेस्ट एन सी सी कॅडेट, उत्कृष्ट कलावंत उत्कृष्ट विद्यार्थी, विद्यार्थीनी पुरस्कार अशा विविध योजनांची माहिती दिली.

तव्दतच विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी विकास कक्ष, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण, समान संधी कक्ष, संगीत कला आणि सांस्कृतिक कक्ष, प्लेसमेंट असे कक्ष महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयांमध्ये सुरू करणे आवश्यक असल्याचे सांगून या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे स्पष्ट केले. तर आशीष देशपांडे यांनी विद्यार्थी विकास विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या पोर्टल आणि त्याव्दारे ऑनलाईन पध्दतीने महाविद्यालयांनी काय प्रक्रिया करावी, याची माहिती दिली. यावेळी प्राचार्य तसेच विकास अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले व सूचनांवर अंमलबजावणी देखील करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी स्पष्ट केले.

संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व विद्यापीठ गीताने सभेची सुरुवात करण्यात आली. सभेच्या आयोजनामागील भूमिका डॉ राजीव बोरकर यांनी स्पष्ट केली. सूत्रसंचालन व आभार डॉ अभिजित इंगळे यांनी मानले. सभेला विद्यापीठातील विविध प्राधिकारिणींचे सदस्य, विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्रांमधील महाविद्यालयांचे प्राचार्य, महाविद्यालयांचे विद्यार्थी विकास अधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page