एका समृद्ध वैचारिक परंपरेचा शेवट
निवृत्त न्यायमूर्ती नाना चपळगावकर यांचे निधन म्हणजे एका समृद्ध वैचारिक साहित्यिक परंपरेचा शेवट असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. माझ्या वडिलांचे नावही नाना च होते. या नानाच्या रूपाने माझ्या छत्रपती संभाजीनगरच्या वास्तव्यात हक्काचे आणखीन एक वडील मिळाले. त्यांच्याशी संवाद म्हणजे विविध सामाजिक, साहित्यिक, राजकीय विषयावर बौद्धिक मेजवानीच असे. गेल्या डिसेंबरमध्येच अशी शेवटची संवादिनी आम्ही अनुभवली.

उशीरा का होईना पण वर्धा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला. खरे तर त्यांची प्रतिभा, वैचारिक द्रष्टेपण या मान सन्मानाच्या पलीकडचे होते. त्यांचे या उतारवयातील प्रगल्भ लेखन म्हणजे सहज हातपाय गाळून मोकळे होणाऱ्या तरुण पिढीसाठी आदर्श वस्तुपाठासारखे होते. अगदी ८६ व्या वर्षी देखील त्यांचे दोन पुस्तकाचे लेखन सुरू होते. पुढच्या भेटीत ही पुस्तके भेट देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.आता ती पुस्तके मिळतील पण त्यांच्या हातून नाही, ही हळहळ कायम सलत राहील. आज पुनश्च पोरके झाल्यासारखे वाटते आहे. ती नानांना भावपूर्ण आदरांजली..

डॉ विजय पंढरीपांडे,
माजी कुलगुरू, साहित्यिक
