अमरावती विद्यापीठात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

विद्यार्थ्यांना रोजगार मेळाव्यातून रोजगार – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते

अमरावती : विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगार मिळावा, यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात केले असून यामधून अनेक विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार आहे. रोजगार मेळाव्याचे सातत्याने आयोजन यापुढे विद्यापीठाव्दारे होणार असल्याची माहिती देऊन कुलगुरू डॉ मिलींद बारहाते म्हणाले विविध कंपन्यांमध्ये जॉब उपलब्ध असून, त्यासाठी आवश्यक कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे. आपल्यातील कौशल्य कसे वाढविता येईल आणि जॉबसाठी आपण कसे उपयुक्त ठरू याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन करुन उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्यात. विद्यापीठाच्या डॉ के जी देशमुख सभागृहात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून व्य प सदस्य डॉ रविंद्र कडू, प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त डी एल ठाकरे, अधिसभा सदस्य अॅड. आशिष सावजी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगारचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, टीसीएसचे एच आर विशाल रामपल्ले, व विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ राजीव बोरकर उपस्थित होते.

रोजगार मेळाव्यामध्ये टीसीएस कंपनीव्दारे विद्यार्थ्यांची कौशल्य चाचणी, मुलाखती घेऊन योग्य उमेदवाराला नोकरी दिल्या जाणार आहे. त्यासाठी कंपनीच्या एच आर नी आयोजन केले. रोजगार मेळाव्यासाठी जवळपास 400 चे वर विद्यार्थी उपस्थित होते. त्यामधून विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. व्य प सदस्य डॉ रविंद्र कडू उद्घाटन झाल्यानंतर मार्गदर्शन करतांना म्हणाले, रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी. मुलाखतीमध्ये स्वत:ला सिध्द करता आले पाहिजे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला पाहिजे. रोजगार मेळावा ब-याच दिवसानंतर होत आहे. वारंवार अशा प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित व्हावे, त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावे, असे अॅड आशिष सावजी म्हणाले. विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता, उद्योजक व्हायला हवे. स्वत: रोजगार देणारे कसे होता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवे, असे डी एल ठाकरे यांनी सांगितले.

राष्ट्रगीत, विद्यापीठ गीत व दीपप्रज्वलनानंतर सुरू झालेल्या कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत करुन प्रास्ताविक भाषणातून रोजगार मेळावे आयोजनामागील भूमिका विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर यांनी मांडली. संचालन कौशल्य विकास विभागाचे ठाकरे यांनी तर आभार प्रांजली बारस्कर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com