यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात राष्ट्रीय योग परिषद ‘योग दर्शन २०२४’ चे उद्घाटन
योग जिवन शैलीचा अवलंब केला पाहिजे – डॉ विश्वासराव मंडलिक
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ‘योग दर्शन २०२४’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे (दि २३) उद्घाटन झाले. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन तसेच महाराष्ट्र राज्य गीत आणि विद्यापीठ गीताने झाला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंतप्रधान योग पुरस्कार प्राप्त योगाचार्य डॉ विश्वासराव मंडलिक, लोणावळा योग संस्थेचे डॉ मन्मथ घरोटे, डॉ विजय कांची हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे हे होते. तसेच विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्र सिंह बिसेन, आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ जयदीप निकम, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ अनिल कुलकर्णी आणि डॉ संजीवणी महाले, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ विष्णू मगरे, त्याचप्रमाणे विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड हे देखील मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक आणि परिषदेचे आयोजक डॉ जयदीप निकम यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी दोन दिवस चालणाऱ्या परिषदेची रुपरेषा उपस्थितांना सांगितली.
याप्रसंगी ‘योग दर्शन २०२४’ परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते करण्याते आले. तसेच डॉ बलवंत सिंग लिखित ‘योग अध्यापन पद्धती’ याविषयावरील पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.
यानंतर पुढील मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
डॉ मन्मथ घरोटे यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, योग हा विषय मनाशी संबंधीत आहे. दर्शनशास्त्र आपल्याला आयुष्याचा आलेख दाखवतो. जिवनात कुठल्यामार्गाने जावे हे दर्शनशास्त्रामुळे समजते. विद्यापीठाने परिषदेचा योग दर्शन हा विषय घेतला म्हणून त्यांनी विद्यापीठाचे विशेष कौतुक केले.
डॉ विजय कांची यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, योग ही भारताला मिळालेली मोठी देणगी आहे. योग आपल्याला स्वत: चे व्यक्तीमत्त्व घडविण्यास मदत करतो, त्यामुळे एक चांगले व्यक्तीमत्त्व म्हणून आपण समाजात वावरू शकतो असेही त्यांनी सांगितले.
डॉ विश्वास मंडलिक यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, आपण दैनंदिन जिवनात योग जिवन शैलीचा अवलंब केला पाहिजे. योगाच्या माध्यमातून आपण आपल्या जिवनाचा क्लेश कमी करू शकतो. योगाचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्रशासनाने देखील दखल घेऊन आयुष्य मंत्रालयाची स्थापना केली.
प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांनी सांगितले की, योग आपल्याला जिवनाचा मार्ग दाखवतो. आपले आचार, विचार आणि व्यवहार यावर नियंत्रण ठेवण्यास योग्य आपल्यासाठी उपयुक्त आहे. परिषदेच्या माध्यमातून योग विषयावर संशोधनास चालना मिळेल. समाजात चांगल्या गोष्टी घडाव्यात याउद्देशाने ह्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे असेही त्यांनी नमूद केले.
कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी आपले अध्यक्षीय मनोगतामध्ये आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी मानसिक संतुलन राखणे महत्त्वाचे आहे आणि यासाठीच योग गरजेचा आहे. योग क्षेत्रातील मान्यवर संस्थांसोबत सामंजस्य करार करून जागतिक स्तरावर योगाचा प्रसार करण्यासाठी आगामी काळात ऑनलाईन एम ए योग शिक्षणक्रम सुरु करणार असल्याचे त्यांनी उपस्थीतांना सांगितले. योगदर्शन ही संकल्पना खुप मोठी आहे, या परिषदेत त्यातील काही भागावर प्रकाश टाकण्यात येणार आहे आणि त्याच्यातून प्रत्येकाला काही ना काही प्रमाणात ज्ञान घेता येणार आहे. ही योग परिषद फलदायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी परिषदेस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभांगी पाटील यांनी केले, तर आभार कुलसचिव दिलीप भरड यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेचे संचालक, प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, नाशिक शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते. या परिषदेमध्ये भारतभरातून जवळपास २०० योग साधक व अभ्यासक प्रत्यक्ष, तसेच आभासी पद्धतीने सहभागी होऊन पेपर सादरीकरणासाठी उपस्थित राहिले आहे.
