रायसोनी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न
पुणे : जी एच रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे येथे आज, शुक्रवार, ६ जून २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रकानुसार आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात १०० हून अधिक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय नेतृत्वाची आणि गौरवशाली ऐतिहासिक वारशाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, तसेच त्यांच्यामध्ये अभिमानाची भावना रुजवणे हा होता.


या सोहळ्याचे ऑनलाइन उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते व्हिडीओ लिंकद्वारे झाले. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व नवोपक्रम मंत्री, महाराष्ट्र राज्य, मंगलजी प्रभात लोढा, इनोआयपीस (INNOIPS), पुणेचे संस्थापक डॉ राघवेंद्र भट आणि फिनोलेक्स जे पॉवर सिस्टिम्सचे टेंडरिंग एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर जयवंत मोरे, तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ एम यू खरात, जितेंद्र मिश्रा, कर्नल अजित सिंघवी, डॉ बाळासाहेब फुगटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी शिवव्याख्याते जयवंत मोरे यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीच्या विचारांचा आणि त्यांच्या अलौकिक कार्याचा सविस्तर आढावा घेतला. महाराजांनी स्वराज्याची स्थापना कशी केली, रयतेचे राज्य कसे निर्माण केले, आणि त्यांच्या प्रशासकीय धोरणांचे महत्त्व काय होते, यावर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांच्या भाषणांमुळे महाराजांच्या पराक्रमाला आणि त्यांच्या कार्याला एक नवा उज्जेळा मिळाला, ज्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ झाली.