एमजीएम विद्यापीठात ‘बाई गं’ चित्रपटाच्या कलाकारांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

संघर्षानंतर मिळणाऱ्या यशाची किंमत अधिक असते – स्वप्नील जोशी

छत्रपती संभाजीनगर : सर्व व्यक्तींच्या जीवनाच्या प्रवासात यशापयश असते, यास कोणीही अपवाद नाही. जीवनाच्या या प्रवासात खचून न जाता आलेल्या अपयशाशी दोन हात करीत लढत राहिले पाहिजे. विशेषत: आपण करीत असलेल्या संघर्षानंतर मिळणाऱ्या यशाची किंमत निश्चितपणे अधिक असते, असे प्रतिपादन अभिनेते स्वप्नील जोशी यांनी यावेळी केले.

‘बाई गं’ या मराठी चित्रपटाच्या रिलीजच्या निमित्ताने एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेते स्वप्नील जोशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमास ‘बाई गं’ चित्रपटातील स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, नम्रता गायकवाड, नेहा खान, दिग्दर्शक पांडुरंग जाधव, निर्माते आशिष अगरवाल तर एमजीएम विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, प्रा शिव कदम व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

पुढे बोलताना स्वप्नील जोशी म्हणाले, अपयश हा जीवनाचा अविभाज्य भाग असून या जगात असा माणूस नाही ज्याच्या वाट्याला अपयश आले नाही. जितका माणूस मोठा तितका संघर्ष, तितके अपयश, तितका ताण अधिक असतो. जर आपल्याला कोणी असे सांगत असेल की, मला केवळ यशच मिळाले आहे तर ती संबंधित व्यक्ती खोटे बोलत आहे असे समजावे.

या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभासंपन्न असे काम केलेले आहे. एमजीएम विद्यापीठाच्या वतीने ‘बाई गं’ या चित्रपटास मी शुभेच्छा देतो. एक चित्रपट म्हणजे हा एक मोठा प्रकल्प असून यामध्ये कला, संगीत, निर्मिती, अर्थशास्त्र, प्रसिद्धी, संशोधन, विज्ञान अशा विविध शाखांच्या अभ्यासातून चित्रपट तयार होत असतो, असे यावेळी बोलताना कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी सांगितले.

यावेळी चित्रपटातील सर्व कलाकारांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली. कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा जाई कदम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा योगिता महाजन यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page