शिवछत्रपती महाविद्यालयात थॅलेसेमिया मुक्त अभियान कार्यशाळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर : वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारतीय समाजात अनेक गंभीर समस्या उद्भवत असून, त्यापैकी थॅलेसेमिया हा एक घातक आजार असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. मानसिक, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या त्रासदायक ठरणारा हा आजार समाजात दुर्लक्षित राहतो, याबाबत जनजागृती करण्यासाठी थॅलेसेमिया मुक्त अभियान अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत हेडगेवार रुग्णालय, दत्ताजी भाले रक्तपेढी येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजकुमार नरवडे यांनी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, थॅलेसेमियाचा प्रसार रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये व ग्रामीण भागात जनजागृती अत्यंत आवश्यक आहे. तसेच तरुण-तरुणींनी विवाहापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

थॅलेसेमिया तपासणी प्रक्रियेबाबत डॉ. योगेश दहिवाळ यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. आजाराची लक्षणे, प्रतिबंधक उपाय आणि वेळेवर निदानाचे महत्त्व यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारी व सामाजिक बांधिलकी जोपासणारी ठरली.
